Wednesday, May 08, 2013


उंबरठा

घरांना उंबरठेच राहिले नाहीत
मुली तिन्हीसांजेला बाहेर जाताना थबकतील कुठे ?
कुठे विसावतील शिणून घरी आलेली कर्ती माणसं ?
निरोपाचे हात हलत नाहीत घरच्यांसाठी
आणि आगंतुकांना मात्र सरळ आत घेतात घरं

उंबरठा नाही, ठेच नाही, पुढच्याचं शहाणपण मागच्या पर्यंत पोहचत नाही
घरं आता रस्त्यावर आली आहेत
की रस्तेच शिरत आहेत थेट घरात ?
कळत नाही !

एक दिवा दारापाशी जळायचा आधी
डोळ्यात तेल घालून
आता उंबरठाच नाही ... म्हणून
दिवाही जळत नाही !

----------------------------  प्रसन्न शेंबेकर